भाषेचे संशोधन हे समाजोपयोगी असले पाहिजे
संशोधकांचा सूर : मराठी संशोधन केंद्राचा उपक्रम
ब्रह्मपुरी/का.प्र.
आपली मातृभाषा आता अभिजात झाली आहे. ही मायबोली खरी टिकविली असेल तर ग्रामीण भागाने. जात्यावरच्या ओव्या, लगीनगीते, महादेवाची गाणी, पोळयातील झडत्या, दंडारगीते, बावला-बावलीची लगीनगीते, भुलाबाईची गाणी, आदिवासी कथा, भिल्लांची गाणी अशा बहुमोल लोकसाहित्याने मराठीला समृद्ध केले व टिकविले. हे लोकसंचित लोकांचा हदयहुकांर होता. आद्यकवी मुकुंदराज, चक्रधरांचा महानुभाव पंथ, ज्ञानोबा - तुकोबाचा वारकरी संप्रदाय, पुढं लावणी, पोवाडयांचा शाहिरी प्रवास यातून समाजमनाची, वस्तुस्थितीची स्पंदने आली. या मौखिक साहित्याचे संकलन व संशोधन झाले पाहिजे. लोकांचे जनजीवन सुलभ होणे, प्रबोधन - मनोरंजन होणे ही साहित्याची भूमिका असली पाहिजे आणि भाषेचे संशोधन हे समाजोपयोगी असले पाहिजे असा सूर मराठी संशोधकांनी काढला.
निमित्त होते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभाग व संशोधन केंद्र आयोजित संशोधनकार्य करणार्या संशोधक विद्यार्थी मुलाखतीचा. हा कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकरांनी प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे व उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला. यावेळी डॉ. जगदिश मेश्राम, डॉ. पद्माकर वानखडे आणि संशोधक उमा चंदेल, माधव चुटे, कु.मेश्राम इत्यादींनी मराठी संधोधनावर दीर्घ चर्चा केली.
प्रास्ताविक डॉ. खानोरकरांनी, संचालन व आभार प्रदर्शन डॉ. वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.